Mumbai Local Accident : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि नायगाव दरम्यान एक दुर्दैवी घटना सोमवारी घडली. येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांना लोकलने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.
मुख्य सिग्नलिंग निरीक्षक वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नलिंग मेंटेनर सोमनाथ उत्तम लांबुत्रे, मदतनीस सचिन वानखडे अशी अपघातात ठार झालेल्या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. हे तिघेही मुंबई रेल्वे विभागातील सिग्नलिंग विभागात कार्यरत होते.
वसई रोड आणि नायगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. हा बिघाड दूर करण्यासाठी तिघेही गेले होते. सिग्नल यंत्रणेची पाहणी करत असतांना वसई रोड आणि नायगाव दरम्यान यूपी धीम्या मार्गावर ४९/१८ किमी वर जात असलेल्या एका लोकल ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेमूळे खळबळ उडाली आहे. हा अपघात कसा झाला याची चौकशी करण्यात येणार आहे. या बाबत माहिती देतांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५५ हजार रुपये देण्यात आले आहे. या शिवाय १५ दिवसांच्या आत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके वितरीत केली जातील. सचिन वानखेडे आणि सोमनाथ यांच्या कुटुंबाला ४० लाख तर वासू मित्राच्या कुटुंबाला सुमारे १.२४ कोटी रुपये दिले जातील. या शिवाय मृत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना इतर देयके देखील दिले जाणार आहे. दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या