BMC Ward : इथंही शिंदेंचीच सरशी! मुंबईतील नगरसेवक संख्या २२७ कायम राहणार, हायकोर्टाचा निर्णय
Brihanmumbai Municipal Corporation Elections : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बीएमसीतील वार्डरचना बदलण्याचा घेतलेला निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केला होता.
Brihanmumbai Municipal Corporation Elections 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील वार्डरचनेत पूनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज न्यायमूर्ती सुनील शुकरे आणि एमडबल्यू चंदवाणी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मुंबईतील प्रस्तावित वार्डरचनेचा निर्णय रद्द केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारने आणि निवडणूक आयोगाने हायकोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता. याशिवाय ठाकरे गटाकडूनही मविआ सरकारच्या समर्थनार्थ युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारची बाजू योग्य ठरवत उद्धव ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावत ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. त्यामुळं आता आगामी मुंबई महापालिकेतील निवडणुकीत पालिकेतील वार्डरचनेत कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
NCP BJP Alliance : भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांवरून शिंदे गटात अस्वस्थता? संजय शिरसाट म्हणाले...
मुंबई महानगरपालिकेत सध्या २२७ वार्ड आहेत, पालिकेतील वार्डरचनेची पूनर्रचना करत ठाकरे सरकारने वार्डांची संख्या वाढवून २३६ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करत पूर्वीची वार्डरचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.