Mumbai Goa Highway Accident: मुंबई- गोवा महामार्गावर अपघात, २५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार
मुंबई- गोवा महामार्गावर एका २५ वर्षीय दुचाकीस्वारचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील अपघाताची घटना ताजी असताना महामार्गावरील पाली पाथरट उभी धोंड येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास आणखी एक अपघात घडला. या अपघातात २५ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, काही काळानंतर पोलिसांनी ती सुरळीत केली. महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळं रस्त्यावर खड्डे व माती असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय.
प्रदीप प्रभाकर धाडवे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे हा पाथरट,पाली येथील रहिवाशी आहे. प्रदीप धाडवे शनिवारी आपल्या कामानिमित्त रत्नागिरी येथे चालला असताना त्याच्या बाईकला अपघात झाला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप धाडवे याच्या मृतदेहावर पाली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रदीपच्या घरची परिस्थिती बेताची असून किरकोळ मोलमजुरीचा कामधंदा करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. प्रदीपचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कशेडी घाटात मुंबईकडून खेडच्या दिशेने जाणार्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत चालकासह ६ जण जखमी झाले होते.
विभाग