Mumbai Gateway Of India Boat Accident : मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात नौदलाची स्पीड बोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि पर्यटकांनी भरलेल्या बोटीला धडकली. बुधवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत तीन खलाशांसह तेरा जणांचा मृत्यू झाला. बचावकार्यात आणखी १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात अपघाताचा थरार कैद झाला आहे. या घटनेत बचवलेल्या गणेश नामक ४५ व्यक्तिने या घटनेचा थरार कथन केला. मृत्यू वेगाने आमच्या दिशेने येत होता आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं, असे गणेश म्हणाले.
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात नौदलाच्या नीलकमल बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती. या चाचणी दरम्यान, ही बोट अनियंत्रित होऊन थेट एलिफंटा येथे जाणाऱ्या प्रवासी बोटीला धडकली. या दुर्घटनेतून बचावलेल्या गणेश यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून नेमका अपघात कसा झाला याबाबत माहिती दिली. नौदलाची एक बोट वेगाने समुद्रातून जात होती. बोट मधील प्रवासी ही बोट पाहत होते. काही जण या बोटीचे व्हिडिओ देखील काढत होते. मात्र, अचानक या बोटीने मार्ग बदलला आणि वेगाने आमच्या बोटीकडे येत होती. नौदलाची ही बोट वेगाने आमच्या बोटीच्या दिशेने येत होती. यामुळं काहीतरी अनुचित प्रकार घडणार अशी कुणकुण आम्हाला लागली होती. अन् काही क्षणात ही बोट आमच्या बोटीला येऊन धडकली.
अपघात झाला तेव्हा गणेश हे बोटीच्या डेकवर उभे होते. यावेळी नौदलाची स्पीड बोट नीलकमल ही त्यांच्या बोटीला येऊन धडकली. ही स्पीड बोट नौदलाची असल्याचे आम्हाला घटनेनंतर समजले, असे गणेश म्हणाले. सुरुवातीला ही बोट वेगाने समुद्रात फिरत होती, तर आमची बोट मुंबईजवळील एलिफंटा बेटाच्या दिशेने निघाली होती. दुपारी ३.३० वाजता मी बोटीत चढलो.
गणेश म्हणाले, "मला क्षणभर वाटलं की नौदलाची बोट आमच्या बोटीला धडकू शकते अन् काही कळायच्या अंत स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली. अपघातानंतर बोट बुडाली. तर बोट मधील प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडत होते. बोटीवर लहान मुलांसह १०० हून अधिक प्रवासी होते.
"मी अरबी समुद्र आणि मुंबईच्या आकाशाकडे पाहत होतो. बोट किनाऱ्यापासून सुमारे आठ ते दहा किमी अंतरावर होती. आमच्या बोटीजवळ मला नौदलाची स्पीड बोट वेगाने फिरताना दिसली. या दुर्घटनेत बोटीवरील नौदलाच्या एका जवानाचा पाय कापला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. बोटीने आमच्या बोटीला धडक देताच समुद्राचे पाणी आमच्या बोटीत शिरले. बोटीच्या कॅप्टनने प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्यास सांगितले. आणि काही क्षणात आमची बोट बुडाली.
बोट बुडाल्यावर गणेश तब्बल १५ मिनिटे समुद्रात पोहत राहिले. त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते. त्यानंतर जवळच्या दुसऱ्या बोटीने त्याला वाचवले आणि इतरांसह गेट वे ऑफ इंडियावर त्यांना आणले. नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांची बचाव पथके अपघातानंतर अर्ध्या तासात बोटीजवळ पोहोचली. वाचवलेल्या १० प्रवाशांच्या पहिल्या गटात मी होतो, असे गणेश म्हणाले.
संबंधित बातम्या