स्वस्त मोबाईलचे आमिष.. पार्सलमध्ये पाठवायचे बटाटे-दगडं, मुंबईतील टोळीचा पर्दाफाश
स्वस्तात महागड्या मोबाईलचे आमिष देत पार्सलमध्ये बटाटे किंवा दगडे पॅक करून पार्सल पाठवत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई क्राइम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. लोकांना फसवण्यासाठी ही टोळी सोशल मीडियावरजाहिरात देत होते.
मुंबई - ऑनलाईन शॉपिंगच्या प्रकारात अनेकदा ग्राहकांची फसवणूक झालेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. स्वस्त माल खरेदी करण्यात मोहात ग्राहकांना हजारोंचा चुना लागतो. अनेक असे प्रकार चव्हाट्यावर येत नाहीत. मात्र मुंबई गुन्हे अन्वेशन विभागाने मालाडमधून एका टोळीच्या मुसक्या आवळ्या आहेत. माहितीच्या महाजालाच्या या युगात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक होत आहे. अशातच मुंबई क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) युनिट ११ ने मालाडमधील एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी स्वस्तात महागड्या मोबाईलचे आमिष देत पार्सलमध्ये बटाटे किंवा दगडे पॅक करून पार्सल पाठवत लोकांची फसवणूक करत होते. लोकांना फसवण्यासाठी ही टोळी सोशल मीडियावर जाहिरात देत होते.
फसवणूक करणारी ही टोळी सोशल मीडियावर स्वस्त मोबाईलची जाहिरात करत होते. ही जाहिरात पाहून अनेक लोक या टोळीच्या जाळ्यात अडकत होते. जेव्हा एखादे ग्राहक या जाहिरातीवर क्लिक करायचा तेव्हा त्याला एक फॉर्म भरावा लागत असे. हा फॉर्म भरल्यानंतर लगेच त्या व्यक्तीला मुंबईवरून कॉल यायचा आणि मोबाईल तुम्हाला तुमच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलेव्हरी मिळेल, असे सांगितले जायचे. मात्र डिलिव्हरी पेमेंट केल्यानंतर पार्सल तपासल्यावर पार्सलमध्ये अगदी जुने मोबाईल किंवा बटाटे-दगडी आढळून यायचे असे पोलिसांनी सांगितले. ही टोळी प्रामुख्याने मुंबईबाहेर राहणाऱ्या लोकांची फसवणूक करत होते. यात बहुतांश ग्राहक हे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा, झारखंड या भागातील आहेत.
इतर राज्यातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट ११ ने मालाडमध्ये तपास सुरु केला. तपासादरम्यान पथकाने मालाड येथील एका गोडाउनवर छापा मारला. या ठिकाणी फेक कॉल सेंटर सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. येथून जुन्या मोबाईलला नव्या खोक्यात पॅक करून सप्लाय केले जात होते. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिटने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे सोशल मीडियावर ४५००रुपयात भारी मोबाईल विकण्याचा दावा करत होते. यासह कॉल सेंटरवर काम करणाऱ्या २५ मुलींना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा जबाब घेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.