Mumbai Boat Accident Update : मुंबईत झालेल्या दुर्दैवी बोट अपघाताप्रकरणी नौदलाच्या स्पीड बोट चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी नौदलाच्या स्पीडबोट चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी नौदलाची स्पीडबोट नियंत्रणाबाहेर गेली आणि प्रवाशांनी भरलेल्या बोटीला धडकली. या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आलं. प्रवाशांनी भरलेली ही बोट एलिफंटा बेटावरून गेट वे ऑफ इंडियाकडे जात होती.
या अपघातात बचावलेले मुंबईतील नाथाराम चौधरी यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार बोट चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात इंजिन चाचणीदरम्यान स्पीडबोटमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाला. स्पीडबोटचे नियंत्रण सुटले आणि ती बोटीवर आदळली. नौदलाने सांगितले की, स्पीडबोट ही एक रिजिड इनफ्लेटेबल बोट (आरआयबी) होती. या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती. या दुर्घटनेनंतर बचाव मोहीम राबवण्यात आली. नौदलाच्या ११ बोटी, मरीन पोलिसांच्या तीन बोटी आणि तटरक्षक दलाची एक बोट या बचाव मोहिमेत सहभागी झाली होती.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ पर्यटकांचा समावेश आहे. यात भारतीय नौदलाच्या ४ धिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नौदलाच्या ज्या स्पीड बोटने अपघात झाला. ती बोट नौदलाने टो करून नेली आहे. या बोटीची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. या प्रकरणी स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदलाच्या या स्पीड बोट मध्ये एकूण ६ जण होते. यातील तिघांचा मृत्यू झाला असून असून १ जण गंभीर आहे. तर दोघांची स्थिती स्थिर आहे. ही स्पीड बोट नेमकी कोण चालवत होतं? या बाबत नौदलाने माहिती दिलेली नाही.
संबंधित बातम्या