मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाची स्पीड बोट आणि प्रवासी बोट यांच्यात भीषण अपघात झाला. या घटनेत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० नागरिक आणि तीन नौदलाच्य जवानाचा समावेश आहे. तर, १०१ जणांना वाचवण्यात यश आले. नीलकमल नावाची बोट प्रवाशांना घेऊन प्रसिद्ध पर्यटनस्थळ एलिफंटा बेटाकडे जात असताना दुपारी चारच्या सुमारास नौदलाच्या स्पीड बोटने त्यांना धडक दिली. या घटनेचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक छोटी स्पीडबोट पाण्यात ४-५ प्रवाशांना घेऊन जाताना दिसत आहे.ती बोट काही अंतरावरून यू-टर्न घेते आणि वेगाने प्रवासी बोटीकडे येते. शेवटच्या क्षणी दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न होतो पण दोन्हींची धडक होते. ही संपूर्ण घटना प्रवासी बोटमधून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाली.
नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेट वे ऑफ इंडिया जवळ समुद्रात दुपारी चार वाजताच्या सुमारास नौदलाची स्पीड बोटच्या इंजिनची चाचणी केली जात असताना नियंत्रण सुटले आणि त्यांनी कारंजाजवळ प्रवाशी बोटीला धडक दिली. या धडकेनंतर बोट समुद्रात उलटली, जी गेट वे ऑफ इंडिया येथून लोकप्रिय पर्यटनस्थळ 'एलिफंटा' बेटावर प्रवाशांना घेऊन जात होती. समुद्रात बोट उलटल्याचे समजताच ताबडतोब बचावकार्य सुरू करण्यात आले. नौदलाची चार हेलिकॉप्टर्स, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन नौका आणि स्थानिक मच्छिमार बचावकार्यात सहभागी झाले. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. तर, १०१ जणांना वाचवण्यात आले. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईजवळ बुचर बेटावर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाची बोट नौदलाच्या बोटीला धडकून उलटली. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच या घटनेचा पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे तपास करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.