Mumbai Airlines News: मुंबईत शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला असून दादर पूर्व, मरीन ड्राइव्ह आणि लोअर परेल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा विमानसेवेवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. खराब हवामानामुळे मुंबईकडे येणारी १५ उड्डाणे वळवण्यात आली माहिती समोर आली. यामुळे प्रवासांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे.
मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक एअरलाइन्स कंपन्यांनी रविवारी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली. तसेच सर्व प्रवाशांना विमानाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला. पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी प्रवाशाला केले.अहमदाबादहून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे विस्ताराचे विमान वळवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे मुंबईला येणारी १५ उड्डाणे वळवण्यात आली.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले असून अनेक भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली असून सकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची नोंद झाली. मुंबईतील दादर, वरळी, परळ, माटुंगा, माहीम आणि प्रभादेवी येथे शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालण्यात आली.
राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने विविध शहरांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली असून वाहतूक कोंडी झाली. याशिवाय भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली असून जीवित व वित्तहानी झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि अमरावती सह इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, सातारा, रत्नागिरी साठी रेड अलर्ट जारी केला होता. तसेच नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
संबंधित बातम्या