Parel Bridge accident : मुंबईच्या परळ पुलावर आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका दुचाकीला डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील तिघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये २ मुली आणि एका तरुणाचा समावेश आहे.
तनिष पतंगे (वय २४), रेणुका ताम्रकर ( वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मुंबईतील परळ पुलावर मंगळवारी मोटारसायकल आणि डंपर वाहन यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. बाईक डंपरवर इतक्या जोरदार धडकली की बाईचा समोरचा भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर, ट्रकचंही नुकसान झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. आज सकाळी ८ च्या सुमारास दुचाकीवर तिघे जण हे जात होते. त्यांची दुचाकी ही परळ पुलावर आली. यावेळी एका भरधाव वेगात असलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भोईवाडा पोलिसांचे एक पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिससांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत.
या घटनेनंतर तिघांनाही रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ओव्हरटेकिंग आणि ओव्हरस्पीडमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संबंधित बातम्या