Mumbai Boat Capsized News: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी नौदलाची स्पीड बोट धडकल्याने प्रवाशी बस समुद्रात उलटली. या दुर्घनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट गेट ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटापर्यंत प्रवाशांना घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पंरतु, तुम्हाला माहिती आहे का? मुंबईमध्ये ७८ वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती, जेव्हा ६०० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले. ही घटना मुंबईत घडलेल्या मोठ्या दुर्घटनापैकी एक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै १९४७ साली सकाळी ८ वाजता एमएस रामदास बोट भाऊच्या धक्क्याकडून रेवसच्या दिशेने जात होती. ही बोट बंदरापासून ७.५ किमी अंतरावर गेली असता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बोट पुढे जात असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळल्या आणि बोट उलटली. त्यानंतर हळूहळू बोटीत पाणी भरले. बोटीत पाणी शिरत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. प्रवाशांना पोहता येत होते, त्यांनी पटापट समुद्रात उडी घेत जीव वाचवला तर काही जण अडकून पडले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास पूर्ण जहाजच समुद्रात बुडाले.
जहाज मुंबईहून रेवासला पोहचण्यासाठी दीड तास लागतो. हे जहाज बुडाल्याची माहिती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणालाच नव्हती. जहाजात असलेल्या एका १० वर्षाच्या मुलाने कसाबसा मुंबईचा किनारा गाठला. त्यानंतर एमएस रामदास जहाज समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कंपनीने घटनास्थळी दोन बोटी मदतीसाठी पाठवल्या. मात्र, तोपर्यंत सर्वकाही संपले होते. या घटनेत जवळपास साडे सहाशे लोकांचा मृत्यू झाला. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे १९५७ मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्यावर वाहात आले होते.
संबंधित बातम्या