राज्यात गेल्या अनेक वर्षापासून सहकार चळवळ उभी राहिली आहे. मात्र आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही. तर ती ‘सहारा’ चळवळ आहे. आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या. अशी ही चळवळ आहे. सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सहकार चळवळ नाही, ही सहारा चळवळ आहे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
मनसेचा पदाधिकारी मेळावा कर्जतमध्ये पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी राज्यातील सहकार चळवळीवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी आत्ताच्या महायुतीच्या सरकारवरही टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात सहकार चळवळ अनेक वर्षांपासून उभी राहिली आहे. त्याबाबत बोलताना त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.
राज ठाकरे म्हणाले, गुजरातचा महाराष्ट्रवर डोळा आहे. आपली महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करतंय का काय, असा प्रश्न उभा आहे. सहकर चळवळ सांभाळायला अनेक महान लोक आहेत. भविष्यातही ती माणसं तयार होतील. आपण इतिहासाकडून शिकले पाहिजे. नाहीतर वर्तमान हातातून निघून जाईल. राजकीय स्वार्थ म्हणून मराठवाड्यात साखर कारखाने केले जात आहेत. तिथे पाणी लागत नाही तरीही हे केलं जातं आहे. मराठवाड्यात विहिरीला ८००-९०० फूट पाणी नाही. साखर कारखाने उभा करून ऊस लागवड होते, पाणी जास्त लागते. पाणी खेचल्यास मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार पुढच्या ४० ते ५० वर्षात मराठवाडा वाळवंट होईल असं म्हटलं आहे. मात्र याचा आम्हाला फरक पडत नाही. मराठवाड्याचं वाळवंट झाल्यास ती जमीन पूर्ववत करायला पुढची ४०० ते ५०० वर्ष लागतील.
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे लढून जमिनी घेत होते. युद्धामुळे कळायचं जमिनी घ्यायला आलेत. पण आता हे राजकारणी कधी जमिनी घेताहेत हे कळतही नाही. आपल्या बाजूला काय होतंय ते समजून घ्या नाहीतर डोक्यावर हाथ मारून घ्यावा लागेल.
संबंधित बातम्या