भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या८६व्या वर्षी दीर्घ आजाराने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला असून सर्व क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. भारताचा कोहिनुर, एन्ड ऑफ इरा, प्राईड ऑफ इंडिया, वुई मिस द ग्रेटेस्ट... या हॅशटॅगसह सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
अनेक सेलेब्रिटींकडून सोशल मीडियावर रतन टाटा यांचे फोटो आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत. त्याचबरोबर रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजुर करून केंद्र सरकारला पाठवला आहे. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कार देण्याबाबत आपले रोखठोक मत मांडले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवं अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. त्याचबरोबर तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही, प्रत्येकाची भावना आहे की, त्यांच्या घरातीलच कोणीतरी गेले आहे.असे पत्र राज ठाकरेंनी नरेद्र मोदींना पाठवले आहे.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात,आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योग जगाला,भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे,ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे,तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली,मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत,आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून?
त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.
तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे. राज ठाकरे ।
संबंधित बातम्या