मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lata Mangeshkar: दीदी गेल्यापासून मी…; लतादीदींच्या जन्मदिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

Lata Mangeshkar: दीदी गेल्यापासून मी…; लतादीदींच्या जन्मदिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 28, 2022 11:07 AM IST

Lata Mangeshkar Birth Anniversary: राज ठाकरे म्हणाले की, लतादीदींचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता आणि ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा पडली.

लता मंगेशकर आणि राज ठाकरे
लता मंगेशकर आणि राज ठाकरे

Lata Mangeshkar Birth Anniversary: भारताच्या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांची आज २८ सप्टेंबर रोजी जयंती. लता दीदी यांच्या निधनानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल आठवणी जाग्या केल्या आहेत. लता दीदी गेल्यापासून त्यांच्याबद्दल फारसं कुठे मी बोललो नाही, त्यांच्या निधनानंतर एक रितेपण जाणवायला लागल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "लतादीदींची आज जयंती. आपल्याला वाढदिवसाच्या मिळणाऱ्या शुभेच्छांचा आनंद असतोच, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात पण विशेष आनंद असतो, त्या व्यक्तींमध्ये दीदी होत्या. त्यांना थेट शुभेच्छा देण्याचा आनंद मला दोन दशकांहून अधिक काळ मिळाला, हे माझं भाग्यच."

दीदी गेल्यापासून मी त्यांच्याबद्दल फारसं कुठेच बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही. दीदींच्या निधनानंतर एक रितेपण जाणवायला लागलं, आणि ह्या रितेपणाच्या तीव्रतेचा अंदाज येण्यातच मधले काही महिने निघून गेले. दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर, त्यांच्या गाण्याबद्दल लिहिणं शक्यच नाही, ते इतकं अत्युच्च आहे की कितीही त्याला शब्दांत पकडायचं ठरवलं तरी हातातून काहीतरी निसटतच राहतंय असं वाटत राहणार अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, लतादीदींचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता आणि ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा पडली आणि ती कायम राहिली आणि पुढेही राहील. हल्ली 'ब्रँड' हा शब्द प्रचलित आहे, किंवा राजकीय, सामाजिक जीवनात 'करिष्मा' हा शब्द वापरतात, हे निर्माण करण्यासाठी प्रचंड अट्टाहास केला जातो. अशा अट्टाहासातून, 'ब्रँड', 'करिष्मा काहीकाळ निर्माण होतो पण तो ओसरतो, निसटून जातो. पण दीदींच्या बाबतीत ते नैसर्गिकपणे आणि सहज घडत गेलं आणि आणि ती घडण्याची प्रक्रिया आणि त्याचं अंतिम टोक ह्या दोन्हींबद्दल दीदी अनभिज्ञ आणि अलिप्त राहिल्या, हे दुर्मिळ आहे.

लतादीदींचे वर्णन केवळं ऋषितुल्य या शब्दात करता येईल असं सांगताना राज ठाकरेंनी म्हटलं की, आयुष्यात फक्त आणि फक्त गाणं ह्या एका गोष्टीवर कमालीचं प्रेम करत, ते आत खोल रुजवत पुढे ते लोकांसमोर ठेवायचं. ते गाणं वरवर सोपं वाटावं पण ते तितकंच कोणालाच पूर्ण गवसू नये इतकं मोठं, अशी साधना केल्यावर जी शांतता, सहजता दीदींच्या वागण्यात आली होती, तिचं वर्णन करायला ऋषितुल्य हाच शब्द मलातरी सुचतोय.

हे असलं सगळं दैवी असतं, ते कधीतरी एकदाच येतं. हे भव्य आणि तरीही अमूर्त वाटणारं 'दर्शन' मला अनेकदा जवळून होऊन गेलं. आयुष्यात सर्वोच्च काय असतं हे पाहणं आणि ते अनुभवणं हे भाग्य मला लाभलं हाच माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद. दीदी जिथे असतील तिथे त्यांना माझा नमस्कार अशा शब्दात राज ठाकरे यांनी लतादीदींचे स्मरण केले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग