मनमोहन सिंग यांनी जे न बोलता केलं, ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलं नाही! राज ठाकरे यांनी लिहिली खास पोस्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनमोहन सिंग यांनी जे न बोलता केलं, ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलं नाही! राज ठाकरे यांनी लिहिली खास पोस्ट

मनमोहन सिंग यांनी जे न बोलता केलं, ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलं नाही! राज ठाकरे यांनी लिहिली खास पोस्ट

Dec 27, 2024 10:44 AM IST

Raj Thackeray Pays Tribute to Manmohan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियात खास पोस्ट लिहून त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

मनमोहन सिंगांनी जे न बोलता केलं, ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलं नाही! राज ठाकरे यांची खास श्रद्धांजली
मनमोहन सिंगांनी जे न बोलता केलं, ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलं नाही! राज ठाकरे यांची खास श्रद्धांजली

Raj Thackeray Latest Social Post : माजी पंतप्रधान व प्रख्यात अर्थतज्ज्ञ यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट लिहून मनमोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अनेकांना जे बोलूनही करता येत नाही, ते मनमोहन सिंग यांनी न बोलता केलं. इतिहास कायमच त्यांचा गौरव करेल,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात की…

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासा होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशा वेळी भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.

जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग.

पुढं ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवानं त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीनं टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य ते म्हणाले होते, "I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…"

इतिहास त्यांच्यावर कधीच क्रुद्ध होणार नाही!

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन...

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर