‘मराठी माणासाला डिवचू नका, कोश्यारींची होशियारी चालणार नाही’, राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray On BS Koshyari : मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना खडेबोल सुनावले आहे.
Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलताना मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रावादीसह शिवसेनेनंही राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर आगपाखड केली असून आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून खडेबोल सुनावले आहेत. यासंदर्भात राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पत्रक जारी करत याबाबतची भूमिका जाहिर केली आहे.
राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केलेल्या पत्रकात 'कोश्यारींची होशियारी' या शीर्षकाखाली राज्यपालांचा समाचार घेण्यात आला आहे. या पत्रकात राज ठाकरेंनी म्हटलंय की, ‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, राज्यपालपद हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्याविरोधात बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील लोकांच्या भावना दुखावल्या जात असून महाराष्ट्रात मराठी माणसानं मन आणि जमिन मशागत करून ठेवल्यामुळंच तर इतर राज्यातील लोक व्यवसाय करण्यासाठी आले आणि येत आहे ना?, दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?’, असा सवाल राज ठाकरेंनी राज्यपालांना विचारला आहे.
'उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका, तुम्ही हे का बोललाय हे न कळण्याइतके आम्ही दुतखुळे नाही, मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.', असं राज ठाकरेंनी जारी केलेल्या पत्रातून म्हटलं आहे.
दरम्यान याआधीन मनसे आणि मनसेच्या नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली होती. त्यामुळं राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपालांना धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या या वक्तव्यामुळं सत्ताधारी शिंदेगटातील आमदारांमध्ये नाराजी असून मुख्यमंत्री शिंदे मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची केंद्र सरकारला आमच्या भावना कळवू, असं शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या