Vidhan Parishad Result :..तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार- देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लोकाभिमुख सरकार येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी विजयाला हातभार लावला. त्यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या १० जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने ५ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला पुन्हा कात्रजचा घाट दाखवला. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे पाचही उमेदवार विजयी होणे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लोकाभिमुख सरकार येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी विजयाला हातभार लावला. त्यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीत मोठा गोंधळ आहे. समन्वय नाही. आमच्या पाचव्या उमेदवाराला मते मिळतील असा विश्वास होता. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते आमच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली. राज्यसभा निवडणुकीत १२३ मते घेतली होती विधान परिषदेच्या निवडणुकीत १३४ मते घेतली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, मविआत नाराजी आहे, आमदारांवर विश्वास नाही हे मी आधीच म्हटलं होतं. पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नव्हतं तरी आम्ही कॉग्रेसच्या दोन्ही उमेद्वारांपेक्षा जास्त मते घेतली
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण आठ उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप यांनी विजयी पताका फडकावली.
सर्व राजकीय पक्षांकडून या विधान परिषद निवडणूकीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते. याचाच भाग म्हणून आजारी असलेले भाजप पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोघेही व्हीलचेअरवर पोहचले होते. दरम्यान या निवडणूकीत गुप्त मतदान आहे. पण टिळक, जगतापांची मतपत्रिका इतर नेत्यांनी मतदान पेटीत टाकली. दोघांच्या मतदानावेळी २ सहकारी नेते उपस्थित असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला केल्याने मतमोजणी वेळाने सुरू झाली.