काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीलाही अपघात झाला आहे. लोकसभा निवडणुकांचा प्रचारासाठी जात असताना आमदार आशिष जयस्वाल यांच्या ताफ्यातील वाहनाला मोठा अपघात झाला. नागपूरपासून २१ किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात ही घटना घडली. यामध्ये जयस्वाल यांच्या पीए यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील दोन जण जखमी झाले आहेत.
शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा नागपूर जवळील केरडी-कन्हान येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या गाडीतील दोन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आमदार आशिष जयस्वाल यांची गाडी त्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या गाडीवर आदळली. यात कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठीखासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारला अपघात झाला.
कन्हान-केरडी मार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या पीएचाही समावेश आहे. अपघात झाला तेव्हा आमदार आशिष जयस्वाल स्वतः कारमधून प्रवास करत नव्हते.
नाना पटोले लोकसभा निवडणुकीचा प्रचार करुन मुंबईला परतत असताना भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ त्याच्या कारला अपघात झाला. पटोले यांच्या कारला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. भाजपकडून पटोलेंचा घातपात करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच याद्वारे चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट, याबद्दल सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंसह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या