India vs Pakistan: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील थरार कोणी कसा विसरू शकतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळण्यात आलेला हा सामना क्रिकेट चाहत्यांच्या आठवणींमध्ये कोरला गेला आहे. तो क्षण आठवून भारतीय क्रिकेट चाहत्यांना अभिमान वाटतो. दुसरीकडे, या सामन्याशी संबंधित कोणताही व्हिडीओ किंवा फोटो पाहिल्यानंतर पाकिस्तान चाहत्यांच्या वेदना बाहेर येतात. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत टी-२० विश्वचषकात त्याच्याकडून नेमके कुठे चूक झाली? याबाबत त्याने दुख: व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ सप्टेंबर २००७ रोजी टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच विकेट्स गमावून १५७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, मिसबाह उल हकने एकाकी झुंज देत शेवटपर्यंत पाकिस्तानला विजयाच्या शर्यतीत कायम ठेवले. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती आणि पहिल्याच चेंडूवर मिसबाहने षटकार ठोकला. यानंतर सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या झुकला होता. कारण पाकिस्तान उर्वरित पाच चेंडूत फक्त ८ धावा करायच्या होत्या. परंतु, त्यांच्या खात्यात शेवटचा विकेट शिल्लक होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिसबाह स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पाकिस्तानने हा सामना अवघ्या ५ धावांनी गमावला.
एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना मिसबाहने २००७ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील वेदना आठवल्या. मिसबाह म्हणाला की, "भारताने दिलेलं लक्ष्य फार मोठे नव्हते. आम्ही हा सामना सहज जिंकू असे आम्हाला वाटत होते. फिरकी गोलंदाजांसमोर आमच्या फलंदाजांना शक्यतो अडचण येत नाही. आम्ही सामन्याची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आमचे फलंदाज अपयशी ठरले. आम्ही अवघ्या ७७ धावांवर ६ फलंदाज गमावले होते. पण यासर अराफत आणि सोहेल तन्वीर यांच्यासोबतच्या माझ्या भागीदारीने विजयाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मला वाटले की, आम्ही सहज जिंकू, पण हा अतिआत्मविश्वास होता. यामुळे आम्ही विश्वचषक गमावला. क्रिकेट असा खेळ आहे की, एका चुकीमुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरले जाते."
संबंधित बातम्या