Tanaji Sawant: विरोधकांवर टीका करताना मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली
Minister Tanaji Sawant: निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.
Tanaji Sawant: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी विरोधकांवर टीका करताना जीभ घसरल्याने त्यांचावर निशाणा साधला जात आहे. बीड दौऱ्यावर असताना त्यांनी विरोधकांवर टीका करताना केलेल्या वक्तव्याची आता चर्चा होत आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही मंत्री सावंत यांनी टीका केली.
शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी केलेल्या या निष्ठा य़ात्रेत बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यांच्या याच निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. याच यात्रेसाठी तानाजी सावंत हे बीडमध्ये पोहोचले होते. यावेळी भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मंत्री सावंत यांनी यावेळी माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा व्यक्त करू नका असं म्हटलं. त्यानंतर बोलताना मंत्री सावंत यांची जीभ घसरली.
मंत्री सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याआधी तुमचे चारित्र्य तपासा असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मंत्री सावत यांनी म्हटलं की, ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिलीत.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना म्हटलं होतं की, हल्ली बाप पळवणारी आली आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, ते आम्हाला म्हणतात तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता. शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा प्रश्नही तानाजी सावंत यांनी विचारला.
महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप तानाजी सावंत यांनी केला. ते म्हणाले की, आमचे सरकार आले आणि अचानक मराठे कसे जागे झाले. ज्या समितीला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं अशी समिती सरकारने स्थापन केली. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मराठा समाजाला मिळणारं आरक्षण हे टिकाऊ हवं अशी आमची भूमिका आहे असंही त्यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या