Most Dangerous Buildings in Mumbai : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक आणि तत्काळ रिकाम्या करण्याची गरज असलेल्या २० निवासी इमारतींची यादी जाहीर केली आहे. या २० इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी इमारती रिकाम्या कराव्यात, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
मुंबई महापालिकेने एकूण १८८ मोडकळीस आलेल्या इमारती जाहीर केल्या असून तेथील रहिवाशांना तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मोडकळीस आलेल्या इमारती शहरात एकूण १० हजारांहून अधिक मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मात्र, यात दुरुस्ती योग्य इमारतींच्या संख्येचाही समावेश आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राज्य गृहनिर्माण प्राधिकरणाकडून मान्सूनपूर्व ऑडिट केले जाते आणि त्या निकालाच्या आधारे या 'धोकादायक' इमारतींमधील रहिवाशांना रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात.
या रहिवाशांना बांधलेल्या ट्रान्झिट सदनिकांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, अनेक रहिवासी जागेची पसंती आणि इतर सामाजिक कारणांमुळे घरे रिकामी करण्यास नकार देतात. मुंबई रिअल इस्टेट मार्केटमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा शहरातील मोठा प्रश्न असून मुंबई पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक धोकादायक २० इमारतींची यादी गिरगाव, काळबादेवी, खेतवाडी, कामाठीपुरा या भागातील असून ८० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. या २० अतिजोखमीच्या इमारतींमध्ये ४९४ रहिवासी आणि २१७ अनिवासी भाडेकरू आहेत.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाअंतर्गत (एमबीआरआरबी) मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचे नियमित मान्सूनपूर्व सर्वेक्षण पूर्ण झाले असून यंदा २० इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये गेल्या वर्षी २०२३ मध्ये अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या चार इमारतींचा समावेश आहे.
दरम्यान, महापालिकेने जारी केलेल्या शहरातील १८८ मोडकळीस आलेल्या निवासी इमारतींपैकी ११० हून अधिक इमारती पश्चिम उपनगरात तर इतर दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि मध्य उपनगरात आहेत.
संबंधित बातम्या