मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार
Marathwadawatercase : उत्तर महाराष्ट्रातील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
मराठवाड्यातील पाणीप्रकरणात दाखल याचिकांवर आज पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे. जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करत याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज एकत्रित सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.
याबाबतची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. राज्य सरकार पाणी सोडू शकते मात्र अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कारखानदारांनी मराठवाड्याला पाणी सोडू नये, असे कारखानदारांचं म्हणंण होतं.
यंदा कमी पर्जन्यमान झाल्यानं आज जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ९६ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून नोव्हेंबर महिन्यात आज मितीला संगमनेरमध्ये एक तर पाथर्डी तालुक्यात आठ ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस जास्त तर लाभक्षेत्रात कमी अशी परिस्थिती आहे.
२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र आता या कायद्यालाच विरोध होत असून या कायद्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होत आहे.
विभाग