Sharad Pawar news today : लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेला आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रश्नावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. 'मराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती करायला काय हरकत आहे? आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांवर जाऊ द्या, असं पवारांनी म्हटलं आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी निवडणुकीत मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा पुन्हा महत्त्वाचा ठरेल असं वाटतं का या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. 'मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी एक भावना आहे. त्यात चुकीचं काही नाही. मात्र ते करताना इतर समाजांचं नुकसान होऊ नये ही भूमिकाही योग्य आहे, असं पवार म्हणाले.
'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली आहे हे उदाहरण आपल्याकडं आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? सध्या ५० टक्क्यांची मर्यादा आहे. जाऊद्या ते ७५ टक्क्यांपर्यंत, असं पवार म्हणाले.
'एक काळ असा होता की तामिळनाडूत आरक्षणाची मर्यादा ७८ टक्क्यांपर्यंत गेली होती. तिथं ७८ टक्क्यांवर जाऊ शकते, तर महाराष्ट्रात ७५ टक्के का होऊ शकत नाही? त्यासाठी २५ टक्के वाढवावं लागेल. तसं झालं तर ज्यांना आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही त्यांचाही विचार होईल आणि इतरांचंही समाधान होईल. कुठलाही वाद राहणार नाही. केंद्र सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा. संसदेत दुरुस्ती विधेयक आणावं. आमचे जे कोणी सदस्य असतील ते केंद्र सरकारला पाठिंबा देतील, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय त्यामुळं त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळणार नाही असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, लोकसभेला कोणाला किती पाठिंबा मिळालाय ते दिसलं आहे. पण आमच्याबद्दल हे बोलणाऱ्यांचे किती लोक निवडून आले? एक तरी निवडून आला का? त्यामुळं त्यांच्याकडं फार गांभीर्यानं बघण्याची गरज नाही.'
संबंधित बातम्या