मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा कट रचला आहे. १० टक्के आरक्षण घेऊन मी गप्प बसावं अन्यथा मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मी शांत बसावं अन्यथा माझा गेम करावा लगेल, अशी योजना फडणवीसांनी आखली आहे. असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
मी उपोषण करताना मरावं यासाठी त्यांनी इतके दिवस मला झुलवत ठेवलं आहे. माझा बळी जावा असे फडणवीसांचं स्वप्न आहे. मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो, मला मारुन दाखवावं, असं आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे.
किर्तनकार अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यामध्ये त्यांनी फडणवीसांवर आरोप करताना म्हटले की, या दोघांचा बोलविता धनी फडणवीस आहे. हे राज्य एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नव्हे तर देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत.
फडणवीसांना वाटतं की, ते मला संपवल्यावर मराठा समाज विस्कटेल. जसे त्यांनी इतर पक्षांमधील नेते संपवले आहेत, तसेच ते मलाही संपवतील असं त्यांना वाटतंय. त्यांना आता मराठ्यांची एकजूट मोडायची आहे. मला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवू पाहत आहेत. मला विष देऊन किंवा एन्काऊंटर करून मारण्याचा प्रयत्नदेखील ते करतील, असा आरोप जरांगे यांनी केला.
दरम्यान या आरोपाबाबत सातारा दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांना विचारण्यात आल्यावर त्यांनी म्हटले की, जरांगे काय बोलले ते मी ऐकले नाही.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज १६ वा दिवस असून त्यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. . मनोज जरांगे हे पैठण-बीडकिन-गंगापूर-वैजापूर-येवला-नाशिक-ठाणे या मार्गावरून जाणार आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण मार्गावर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
संबंधित बातम्या