मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्या सर्वच्या सर्व २८८ आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाडण्याचे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड येथे आयोजित सभेत केलं आहे. मनोज जरांगे यांच्या बीड येथील सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘दोन ते तीन महिने संयम धरा. सरकारच्या बाजुने जाऊन मराठा समाजाचं वाटोळं करू नका’ असं आवाहन जरांगे यांनी या सभेत मराठा समाजाला केलं. बीड जिल्ह्यात मराठ्यांवर अन्याय करणारा एक पण निवडून द्यायचा नाही, असंही ते म्हणाले. आपल्या विचाराचा आहे की नाही ओबीसी निवडन दिली तरी चालेल. पण आरक्षण विरोधकाना जागा दाखवाच, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केली.
मराठा समाजाला जर आता आरक्षण मिळालं नाही तर पुढच्या २०-२५ पिढ्या वाया जातील, असं जरांगे म्हणाले. आमच्या वेदना तुम्हाला समजणार नाहीत, आत्महत्या केलेल्या घरात जाऊन एकदा बघा. मरण काय असतं आणि घरावर काय संकट असतं हे आम्ही पाहिलंय. तुम्ही फक्त मराठ्यांची चेष्ठा केलीय, असा आरोप जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
राज्यात सरकार जातीजातीत फूट पाडत असून राज्याच जातीजातीत दंगली झाल्या पाहिजेत अशी सरकारची इच्छा आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. सरकारला छगन भुजबळ यांच्या माध्यमातून जातीय दंगली घडवायच्या असल्याचं ते म्हणाले. 'आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. महाविकास आघाडीचे नेते सर्वपक्षीय बैठकीला गेले नाहीत म्हणून महायुतीवाल्यांनी आरक्षणावर निर्णय घेतला नाही. आरक्षण देण्यापासून त्यांना कुणी अडवलं होत? याचा अर्थ तुमचीच इच्छा नाही, असं मला वाटतं. महाविकास आणि महायुतीवाले एकच आहेत असं दिसतंय, असंही जरांगे पाटील म्हणाले.
राज्याचेे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मराठा आंदोलकांशी बोलायला येत असत. परंतु ते आंदोलन फोडण्यासाठी पटाईत आहेत, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातील अनेक मतदारांनी उदासीन राहून मतदान केलं नाही, असं जरांगे म्हणाले. मतदान प्रत्येकाने करायलाच हवे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मागण्यासाठी अनेक तरुण माझ्याकडे येतात. दररोज ५० तरुण माझ्याकडे विधानसभेसाठी तिकीटाची मागणी करत असल्याचं जरांगे म्हणाले.
संबंधित बातम्या