Mala Auto Accident: मुंबईच्या मालाड पश्चिम येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. वसीम अन्सारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अन्सारी नातेवाईकांना भेटून घरी जात असताना रात्री नऊ वाजता मिठ चौकी जंक्शनजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता रिक्षाच्या धडकेनंतर अन्सारी अनेक फूट हवेत फेकले गेले, अशी माहिती मालवणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर आरोपीने रिक्षाचालकाने अन्सारी यांना आपल्या रिक्षातून रुग्णालयात नेले आणि रिक्षा रुग्णालयातच सोडून तो फरार झाला.
अन्सारी यांचा मोठा भाऊ तनवीर याने सांगितले की, मालवणी पोलिसांकडून त्यांना अपघाताची माहिती देणारा फोन आला. "आम्ही ताबडतोब शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे मला मागच्या सीटवर रक्त असलेली एक रिक्षा दिसली. मी फोटो काढला आणि भावाची विचारपूस करायला गेलो, असे तनवीर म्हणाला. मात्र, तिथे डॉक्टरांनी रिक्षाचालक पळून गेल्याचे तनवीरला सांगितले.
डॉक्टरांनी अन्सारीला मृत घोषित केल्यानंतर तनवीर यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि २७९ (बेदरकारपणे वाहन चालविणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (वेगाने वाहन चालविणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मालवणी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही रिक्षा जप्त केली असून आरोपींचा शोध घेत आहोत.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा एका अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर शहरात तब्बल ७१ अपघात झाले. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६० जण जखमी झाले आहेत. अतिवेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे आणि बेदरकारपणे वाहन चालविणे या कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून समोर आले आहे.
दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालविणे, शहरात वाढलेली बांधकामे यामुळे पुण्याभोवती अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे विविध नागरिक मंचांचे म्हणणे आहे. वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनच्या (डब्ल्यूएचएसए) म्हणण्यानुसार, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे ये-जा करण्यास विलंब होत असून, कार्यालयीन नागरिकांना दररोज गैरसोय आणि नाहक विलंबाला सामोरे जावे लागत आहे.ओव्हरस्पीड आणि शहरात सुरू असलेली नागरी कामे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे डब्ल्यूएचएसएचे संचालक दीपक पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या