Supriya Sule : “मग अजित पवारांना मुख्यमंत्री करा, तुम्हाला..”, सुप्रिया सुळेंची एकनाथ शिंदेंना ऑफर
वेदांता प्रकल्पावरून (vedanta foxconn project) सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं,असा टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबई – वेदांत-फॉक्सकॉन कंपनीचा (vedanta foxconn project) सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. यावरून राष्ट्रवादी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांच्या नेतृत्वात आज पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
वेदांता प्रकल्पाच्या माध्यातून १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातला वळवली आहे. ही गुंतवणूक तीन टप्प्यात होणार होती. यावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.
वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मोदींनी आश्वासन दिले आहे की, याहून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ. यावरूनही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की, त्यांनी अजित पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ…” असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रकल्प मिळत असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण महाराष्ट्राचा प्रकल्प तिकडे गेला,हे खूप मोठं दुर्दैव आहे. यामुळे लाखो नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे,त्यांनी यावर राजकारण न करतासर्वांनी एकत्रितपणे येऊन लढावे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी इतर दौरे रद्द करून यावर चर्चा करावी. त्यांनी घरगुती दौरे बंद करावेत. पालकमंत्री नसल्याने राज्याचं नुकसान होत आहे,असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुळे म्हणाल्या की,वेदांत कंपनी गुजरातला जाणं,हा राजकारणाचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की,त्यांनी एकत्र यावे आणि सर्वांनी एकत्रितपणे केंद्र सरकारला विनंती करावी.
संबंधित बातम्या