रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कार दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एक महिला व दोन पुरुष आहेत. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळ चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मृत महिलेचे नाव राधा जाधव असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातग्रस्त वाहन सांगोल्याहून कोल्हापूरकडे जात होते. दरम्यान शिरढोण गावाजवळील उड्डाणपुलावर भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या दुभाजकावर आदळली. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यातील तीन जण जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर मिरजेतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत व जखमी कोल्हापूरचे असल्याचे समोर आले आहे. सांगोल्याहून परतताना त्यांनावर काळाने घाला घातला.
अपघातग्रस्त वाहन हुंदाई क्रेटा आहे. या गाडीला सहा एअरबॅग्ज अजूनही प्रवाशांचे प्राण वाचू शकले नाहीत. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले व जखमीला रुग्णालयात हलवले.
संबंधित बातम्या