Mahashivratri 2024 : नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी सलग ४१ तास खुलं राहणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahashivratri 2024 : नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी सलग ४१ तास खुलं राहणार!

Mahashivratri 2024 : नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी सलग ४१ तास खुलं राहणार!

Mar 08, 2024 10:55 AM IST

Nashik Trimbakeshwar Temple News: महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यामुळे हे मंदीर सलग ४१ तास दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले आहे.

Nashik Trimbakeshwar temple
Nashik Trimbakeshwar temple

Mahashivratri 2024: महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी आज (८ मार्च २०२४) महाशिवरात्री साजरी केली जात आहे. भारतात महादेवाची एकूण १२ मंदिरे आहेत. यातील नाशिक (Nashik) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Temple) हे देशातील प्राचीन तीर्थस्थान आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी देशभरातील भक्त लाखोच्या संख्येत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात येतात. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी सलग ४१ तास उघडे राहणार आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने गजबजली आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी दर्शनासाठी सलग ४१ तास उघडे ठेवण्यात येणार आहे. आज शुक्रवारी पहाटे ४ वाजल्यापासून शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी उघडे राहणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेता दर्शनाचे नियोजन करण्यात आले. तर, गर्भगृह दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे.

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ ज्योतिर्लिंगे असे म्हटले जाते. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर त्यापैकी एक आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराला आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे.

एका पौराणिक कथेनुसार, ज्या दिवशी भगवान शिवाचा देवी पार्वतीशी विवाह झाला होता, तो दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह लावतात. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. समुद्रमंथनाची त्यापैकी एक आहे. या कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने, समुद्र मंथनातून निघालेले विष प्राषन करून सृष्टीचे रक्षण केल्याचे म्हटले जाते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर