Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून मुंबईत
Winter Assembly Session Nagpur : अनेक मुद्यांनी गाजलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे आज अखेर सूप वाजले असून पुढील अधिवेशन मुंबईत २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Winter Assembly Session Nagpur : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाचं आज अखेर सूप वाजलं. दोन आठवडे चाललेल्या या अधिवेशनात लोकायुक्त विधेयकाला मंजुरी हे खास वैशिष्टये ठरले. त्याचबरोबरआदित्य ठाकरेंवरील आरोप-प्रत्यारोप, दिशा सालियन मृत्यू प्रकरण, जयंत पाटलांचं निलंबन, अब्दुल सत्तारांवरील आरोप, मुख्यमंत्र्यांवर भूखंड वाटपाचा आरोप, नितीश देशमुखांची पोलिसांना दादागिरी, अजित पवार व फडणवीसांची एकमेकांवरील टोलेबाजी यासह अनेक मुद्यांनी नागपुरातील हे अधिवेशन चांगलंच गाजलं. या अधिवेशनात कर्नाटक सीमावादासंदर्भात ठराव मंजूर करून कन्नडिगांना चपराप लावण्यात आली. आज हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं असून आता २७ फेब्रुवारी २०२३ पासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.
दोन आठवडे चाललेल्या या अधिवेशनात पहिल्या आठवड्यात काही विशेष कामकाज झाले नसले तरी दुसऱ्या ठवड्यात दोन्ही सभागृहांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले, तर दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर आंदोलन करत आदित्य ठाकरेंची चौकशीची मागणी केली. त्यानंतर फडणवीसांनी दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची घोषणा केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे कार्यालय बाळासाहेबांच्या शिवसेनेने ताब्यात घेतले व तेथून उद्धव व आदित्य ठाकरेचे फोटो हटवले. त्यानंतर उद्धव ठाकरे व दीपक केसरकरांचा आमना-सामना झाला व उद्धव यांनी केसरकरांनी चांगलेच सुनावले. मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख केला तर त्याला उत्तर देताना फडणवीसांनी सुनेत्रा वहिनींना विचारले का, असा सवाल केल्याने सभागृहात हास्यकल्लोळ झाला. सभागृहाबाहेर ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला.
विरोधकांनी एनआयटीचे भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना अडचणीत आणत दिशा सालियन प्रकरण उकरून काढले व फडणवीसांनी लगेच एसआयटी चौकशीची घोषणाही करून टाकली.
संबंधित बातम्या