Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट; पुण्यापाठोपाठ नाशिकही गारठले; ओझर सर्वात थंड
Maharashtra Weather : राज्यात या आठवड्यात तापमानात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली होती. यानंतर आता नाशिक, नागपूर, औरंगाबाद शहरातील तापमानात घट झाली आहे. नाशिक मधील ओझर सर्वात थंड होते. या ठिकाणी ५.७ एवढ्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
पुणे : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात कमाल तापमानात सर्वाधिक घट पाहायला मिळाली. काही जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअस पेक्षाही कमी होते. पुण्यात ९.७ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली. तर नाशिकमधील ओझरमध्ये राज्यात सर्वाधिक कमी ५.७ तापमानाची नोंद झाली. या पाठोपाठ नंदुरबार, वर्धा, नागपूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यातही १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील ही थंडीची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच थंडीची लाट आलेली आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात आता पर्यन्तचे सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा तसेच विदर्भात ही थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे.
राज्यात पुण्यात आतापर्यन्त सर्वाधिक कमी तापमनाची नोंद झाली होती. मुंबईतही हवेत गारवावाढला असून दमट हवामानाचा सामना करणारे नागरिक थंडीचा अनुभव घेत आहेत. राज्यात पुण्यातील पाषाणमध्ये ८.७ अंश सेल्सिअस, अहमदनगर ९,८, कर्जतमध्ये १४ अंश सेल्सिअस, लोणावळ्यात १३.८ अंश सेल्सिअस, तळेगाव येथे १० अंश सेल्सिअस तर राहुरी ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नाशिक मधील ओझरमध्ये सर्वाधिक थंड तापमानाची नोंद झाली. ओझर मध्ये ५.७ एवढे नीचांकी तापमान नोंदवले गेले. यावर्षीचे सर्वात कमी तापमान आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथेही आज ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात आकाश स्वच्छ असून वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे. येत्या आठवड्याभर ही थंडीची लाट राहणार आहे. त्यानंतर पुन्हा उष्णतामान वाढणार अशी शक्यता हवामान विभागणे वर्तवली आहे.
राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागांतही शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे घालत असून सकाळी गरमागरम चहा प्यायला पसंती देत आहेत. त्यामुळं आता राज्यात बदललेलं वातावरण पुढील किती दिवस राहणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
संबंधित बातम्या
विभाग