Maharashtra Weather Update : राज्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली होती. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. मात्र, हा पाऊस आता ओसरला आहे. आज आणि उद्या बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे. तर २६ आणि २७ तारखेला राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे. उद्या शनिवारी विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आता उकाडा जाणवायला सुरूवात होणार असून कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे शहर आणि जिल्हा व परिसरात हवामान कोरडं राहणार आहे. आकाश सामान्यत: निरभ्र राहणार आहे. तर अधून मधून काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात देखील वातावरण कोरडे राहणार आहे. पुण्यात आज कमाल तापमान हे २९ ते ३० अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे २० डिग्री अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या