Maharashtra Unseasonal Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांना सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) झोडपलं. एकीकडे राज्यातील जनता उष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झाली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे रब्बी ज्वारी तसेच इतर फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे..
अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हातातोंडाशी आलेली पिके निसर्गाने हिरावून नेल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली असून घरावरील पत्रेही उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
आज दिवसभर कडाक्याचे ऊन होते. तापमान वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
यासोबतच शेतकऱ्यांची रब्बी ज्वारी काढणीला आली आहे, अशा शेतकऱ्यांच्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अन्य फळ पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. आज पुणे, अकोला, नाशिक, रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. गेल्या २ ते ३ दिवसापासून होत असलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. रत्नागिरीतील दापोलीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, निजामपूर भागात पावसाच्या सरी कोसळल्या.
ठाण्यातील काही जिल्ह्यात पुढील ३- ४ तासांत विजांच्या कडकडाटासह गडगडाटसह वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी माहिती दिली. लोकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून कमाल शहरासह तीव्र उष्णतेने होरपळणाऱ्या मुंबईच्या शेजारील जिल्ह्याला या पावसामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या