Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुळसाधार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कापणी केल्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही भागाला गारपीटीचा फटका बसला. दरम्यान, आज देखील पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी विदर्भात काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात गारपीट झाली. संध्याकाळी ६ च्या सुमारास अचानक वातावरण बदलून ढग दाटून आले. थोड्याच वेळात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाळा सुरुवात झाली. या सोबतच गारपीट देखील झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. या पूर्वी दिवसभर ढगाळ हवामान होते. पवनार येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील टीनपत्रे उडाली, तर अनेक झाडे कोसळली. गहू आणि चणा पिक काढणी शिल्लक असल्याने त्याचे नुकसान झाले. तसेच केळीच्या बागांचे देखील नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
भंडारा जिल्ह्यात साकोली येथे देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. संध्याकाळच्या सुमारास बहुतांश जिल्ह्याला पासवाने झोडपले. पावसामुळे गहू, भात, मका या पिकांसह तरकारी मालाचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वर्धा, भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यात देखील गारपीट आणि वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने गहू पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
नागपूरमध्ये पारशिवनीत दुपारी झालेल्या गारपीटसह मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली. या पावसामुळे मिर्ची पिकाचे मोठे नुकसान झाले असून याचा उत्पादनावर परिमाण होणार आहे.
संबंधित बातम्या