Maharashtra Weather News : राज्यात हवामानात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात विदर्भात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुढील चार दिवस विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आजपासून कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील २४ तासात किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील दोन दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती असून राजस्थानपासून वरच्या बाजूला समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने उत्तर भारतात कडाक्याची थंडी व दाट धुक्याची चादर आहे. महाराष्ट्रात मात्र सध्या असा कोणताही इशारा देण्यात आला नाही.
पुणे व परिसरात आज पासून पुढील पाच दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपार व संध्याकाळ नंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
मुंबई व उपनगरात गारठा कमी झाला आहे. शहर व उपनगरांमध्ये सकाळी धुके आणि दुपारी व संध्याकाळी हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कमाल व किमान तापमान ३३ डिग्री आणि २० डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भारत व मध्य भारतात पुढचे २४ तास कमी तापमान राहणार असून २-३ डिग्री सेल्सियस तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. किमान तापमानात वाढ झाली असली तरीही काही भागांत गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या