Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा आणि पावसाचा दुहेरी मारा सुरू आहे. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तर लगतच्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाने नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जना विजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने कोकण मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कोकणातील रायगड, पालघर, व ठाणे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर मध्यम मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुद्धा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडून त्यानंतर वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तर लगतच्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे.
१७ मे रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह म्हणजेच ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ व १९ मे रोजी बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना मेघगर्जना विजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३० ते ४० किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे आणि परिसरातील पुढील दोन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडालासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर आकाशात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. आज शुक्रवारी देखील पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मॉन्सूनचे आगमन दक्षिण अंदमान समुद्रात तसेच दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात आणि निकोबार अंदाजे १९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. तर नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये ३१ मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या