Maharashtra Weather Update In Marathi: सध्या पडलेल्या कडक उन्हामुळे सगळेच मुंबईकर प्रचंड त्रासले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला दिसला. मात्र, काल दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा तडाखा काहीसा कमी झालेला दिसला. परंतु. हवेतील उष्णता होती. तर, या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला कडाक्याच्या विजांसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गरमीपासून काहीशी सुटका झाली. मात्र, या वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी मुंबईमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात आणि पालघरमध्ये देखील यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि कोकण विभागात, तसेच गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पावसाचा अंदाज वाजवण्यात आला होता. गोव्यातही पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत. ऑक्टोबरच्या केवळ अठरा दिवसांमध्ये गोव्यात तब्बल ११० टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. तर, संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या चार टक्के कमी पाऊस पडला आहे. मुंबई शहरासह, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र अतिरिक्त, तर काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस पडला असून, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी देखील तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे.
मध्य महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, कोल्हापूर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली. तर, मराठवाड्यातील धाराशिव, विदर्भातील बुलढाणा येथे देखील अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला. सध्या दक्षिण आंध्र प्रदेश पासून कर्नाटक रायल सीमीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, अरबी समुद्रामध्ये चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्हीमुळे कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसणार आहे.
मुंबईत शनिवारी आणि रविवारी पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग येथेही आठवड्याचे शेवटाला जोरदार गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, घाट परिसर, पुणे, पुण्यातील घाट परिसर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर यासारख्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यात देखील तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव तर विदर्भातील अमरावती यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणा येथे देखील पावसाच्या सरी बरसणार आहेत.
संबंधित बातम्या