Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात (IMD alert) मोठी वाढ होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा(Marathavada Weather), विदर्भ (Vidarbha weather), मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता आहे. याच बरोबर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील मुंबईसह (Mumbai Weather) पालघर, रायगड, ठाण्यात तापमानात वाढ होणार आहे. तर विदर्भात यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात देखील पुढील तीन दिवस पारा वाढणार आहे. तर काही ठिकाणी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिकारेषा दक्षिण तमिळनाडूपासून आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत आहे व ती विदर्भ मधून जात आहे. राज्याच्या संपूर्ण भागामध्ये पुढील २४ तासात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज पाच तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सहा ते आठ एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये सात व आठ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच विदर्भामध्ये पाच व सहा तारखेला तुरळक ठिकाणी रात्री उकाडा जाणवणार आहे व तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
नाशिक अहमदनगर सोलापूर जालना बीड नांदेड लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सहा तारखेनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या संपूर्ण भागामध्ये कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
पुणे आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भातील अकोला, चंद्रपुर, यवतमाळ येथे पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे, आणि पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रावर सध्या प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहेत. गुजरातवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे हे वारे येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर व रायगड येथे तापमानात वाढणार आहे.
पुढील काही दिवस राज्यातील विदर्भात यवतमाळ, वर्धा, अमरावती, येथे उष्णतेच्या लाटेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद लातूर, येथे मेघर्गजना, व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर बीड, नगर, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
राज्यात सूर्य आग ओकत आहे. राज्यात गुरुवारी चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, यवतमाळ, मालेगाव, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तपमानची नोंद झाली. या जिल्ह्यात तापमान हे ४२ डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते.
संबंधित बातम्या