Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका हळू हळू वाढत आहे. त्यात दिवसाच्या तापमानात देखील वाढ होत आहे. असे असताना आता राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर थंडी गायब झाली होती. मात्र, आता थंडीसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हे वारे राजस्थानसह त्या लगतच्या परिसरात असून हेच वारे पश्चिम मध्य अरबी समु्रावरून पुढे सरकणार असल्याने राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने पालघर, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्यासह ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या नैऋत्येकडील मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात देखील ढगाळ हवामान राहणार असून हलक्या पावसाचा सारी पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात देखील किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होयची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर असून आज देखील विरळ धुके पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सध्या प्रदूषणाचं प्रमाण कमी झाल्यानं थेट सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यानं मुंबई शहर, उपनगर आणि कोकणामध्ये तापमान उष्ण जाणवत आहे.
काश्मीर खोऱ्यातील पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टीमुळे दृश्यमानता कमी झाल्याने श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. श्रीनगर विमानतळावर सकाळी दृश्यमानता कमी झाल्याने दाट धुक्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने शुक्रवारपासून विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे दिवसभरातील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने दिली. दृश्यमानता ५० मीटरइतकी कमी होती.
विमानतळावर विमाने उतरण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी दृश्यमानता १००० ते ११०० मीटर असावी लागते. जसजसा दिवस पुढे गेला तशी डोंगराळ भागात अधिक बर्फवृष्टी झाली, तर मैदानी भागात पाऊस पडला. दोन दिवस मुसळधार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजधानी श्रीनगरमध्येही दुपारी हलका पाऊस झाला.