Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे. तापमानात मोठी घट होत आहे तर कुठे तापमान वाढलेले दिसत आहे. पुढील काही तासात ४८ तासांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईतही पहाटे गारवा जाणवत आहे. तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. तर पहाटे थंड वारे वाहात असल्याने मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. पुण्यात देखील सकाळी थंड वारे वाहत असून धुके पडत आहे. राज्यात, सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
राज्यातील तापमानात दिवाळी नंतर घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा सर्वाधिक खाली आला आहे. राज्यात काही जिल्ह्यात रात्री कडाक्याची थंडी जाणवत असून या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता शेकोट्यांचा आधार घेत आहे. तर स्वेटर, गरम कपडे देखील कपाटातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात देखील सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा कडाका जाणवतो. तर विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात देखील थंडी जाणवत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर पुण्याच्या तापमानात देखील घट झाली आहे. पुण्यात दोन अंशांनी तापमानात घट झाली आहे. पूढील काही तासांत तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या शहरात सकाळी, सायंकाळी व रात्री थंडी पडत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. ८ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या