मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain: विदर्भात यलो तर राज्यातील इतर भागात ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Rain: विदर्भात यलो तर राज्यातील इतर भागात ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिला इशारा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 17, 2022 09:38 AM IST

Maharashtra Rain: शुक्रवारी मुंबईत पावसामुळे काही भागात पाणी साचले होते, तसंच लोकलसेवेवरही परिणाम झाला होता. तर पुण्यात अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

विदर्भात यलो तर राज्यातील इतर भागात ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिला इशारा
विदर्भात यलो तर राज्यातील इतर भागात ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिला इशारा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Rain: राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली.

पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणातील अनेक भागात पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. आज हवामान विभागान रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं, यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसंच लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला होता. लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या. पुण्यातही पावसाचा जोर वाढला असल्यानं खडकवासला धरणातून विसर्ग ३० हजार क्युसेक करण्यात आला. यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. यामुळे अद्याप पुराचा धोका नसला तरी गरज पडल्यास स्थलांतरासाठी महापालिकेच्या ३९ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या