Maharashtra Weather Updates: भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १२ ते १४ जुलै असे तीन दिवस अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, वरील भागात ११ जुलैसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी आरएमसीने पुढील चार दिवस १४ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. पालघरमध्ये १२ आणि १३ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान ३२ ते २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ साठी १२ ते १४ जुलै दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आरएमसीने वर्तवली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आणि विमान सेवा विस्कळीत झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व पथकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवसांत पूर्व भारताला लागून असलेल्या ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १२ ते १५ तारखेदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटककिनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. ११ ते १३ तारखेदरम्यान पश्चिम हिमालयी प्रदेशात आणि पुढील ५ दिवसांत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
संबंधित बातम्या