Maharashtra Rain: राज्यातील ४ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू
Maharashtra Rain updates: राज्यात कोणत्याही जिल्ह्यात रेड अलर्ट नाही. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Rain: राज्यात गेल्या आठवड्याभरात अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान आता येत्या चार दिवसात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. आज राज्यात कोणत्याही जिल्ह्यात रेड अलर्ट नाही. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील काही नद्यांना इशारा आणि धोका पातळी ओलांडली आहे. राज्यात मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि गडचिरोली या ठिकाणी एनडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात आहेत.महाराष्ट्रात एकूण १४ एनडीआरएफची आणि ६ एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात पावासाने जोरदार हजेरी लावली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुसळधार सुरू असलेल्या पावसात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४ जणांना पावसामुळे प्राण गमावले आहेत. तर १८१ प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. तसंच ७ हजरा ९६३ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
पुण्यात हवामान विभागाने येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरले असून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी सध्या स्थिर आहे. शुक्रवारी सकाळी पाणी पातळी ३७.७ फुटांवर होती. अंजनी आणि चिपळून यादरम्यान रेल्वे मार्गावर माती आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक काल दोन तास ठप्प झाली होती.
संबंधित बातम्या