Unseasonal rain with storm in Maharashtra : राज्यात उकाड्याने हैराण जनतेला वळीवाच्या पावसाने मोठा दिलासा दिला असून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक शहरात अवकाळी पावसाने थैमान घातले. मुंबईत धुळीच्या वादळाने घरा-घरात धुळीचे साम्राज्य दिसून आले. जोरदार वाऱ्यामुळे मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या असून जवळपास ४० जण जखमी झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने काही ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे.
हवामान विभागाने आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाची इशारा दिला होता. त्यानंतर दुपारनंतर राज्यातील अनेक ठिकाणी वातावरणात अचानक बदल झाले व वादळी वारे,गारपिटीसह मुसळधार पावसाने तडाखा दिला.
पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, शिरूर व पुणे शहरात पावसाने झोडपून काढले. हिंगोलीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं. हिंगोलीतील वरूड, पुसेगाव, नरसी पहेनी, वैजापूर, सरकळी, हळदवाडी,जांभरून गिलोरी, चांगेफळसह परिसरात सायंकाळपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
मुंबई ठाण्यासह आज रायगड जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कर्जत, खालापूर, पेण अलिबाग तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असून येत्या दोन दिवस मुंबईसह, कोकण आणि कोल्हापूर भागात अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, अमरावती जिल्ह्यात व मुंबईत हवामान खात्याने १५ मे पर्यंत पावसाचा अलर्ट दिला आहे.
कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारादेखील पडल्या. ढगांमुळे काळोख पसरल्याने भर दुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव येत होता. डोंबिवली, कल्याण भागात अनेक ठिकाणी वीज नसल्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २ तासात ठाणे. पालघर, रायगड, अहमदनगर, मुलुंड, टिटवाळा, कल्याण तसेच मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पाऊस बरसणार आहे. त्याचबरोबर पुणे व सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या