सकाळी राज ठाकरेंशी भेट तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना बोलावले; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सकाळी राज ठाकरेंशी भेट तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना बोलावले; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळी राज ठाकरेंशी भेट तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना बोलावले; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ

Published Feb 11, 2025 11:20 PM IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काहीतरी बिनसले असल्याची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे व उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

उद्धव-राज व देवेंद्र फडणवीस
उद्धव-राज व देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत काहीतरी बिनसल्याच्या तसेच महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजीच्या बातम्या समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांसोबत दोन बैठका घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली तर सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तीन नेते मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आपल्या निवासस्थानी बोलावून चर्चा केली.

राजकीय जाणकार या बैठकांची वेळ महत्त्वाची मानत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकांचा संबंध बीएमसी निवडणुकीशी जोडला जात आहे. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने भाजपला महापालिका निवडणुकीत स्वत:ला यशस्वी सिद्ध करायचे आहे. जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका काबीज करण्याचे भाजपचे स्वप्न राहिले आहे.

शिवसेना एकत्र असताना महापालिकेवर त्यांचे वर्चस्व राहिले आहे. पण आता शिवसेनेत फूट पडल्याने भाजपच्या महत्त्वाकांक्षेला पंख फुटले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा आधीच केल्याने फडणवीस यांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

राजकीय जानकारांचे म्हणणे आहे की, ठाकरे कुटूंबातील दोन्ही गटांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी एकनाथ शिंदे यांना स्पष्ट संदेश आहे की, भाजपसमोर अनेक पर्याय उपलब्ध असून सर्व खुले आहेत. एकप्रकारे फडणवीस शिंदे गटावर दबावाचे राजकारण करत आहेत. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनीही ही शिष्टाचार भेट असल्याचे म्हटले असून यात राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही पहिलीच भेट होती.

दोन्ही गटांशी बैठक कोणत्या कारणामुळे?

सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत माहीम निवडणुकीवरही चर्चा झाली. बीएमसी निवडणुकीसाठी धोरणात्मक अर्थ काढण्यासाठी भाजप अमित ठाकरे यांना विधान परिषदेची जागा देऊ शकते. फडणवीस यांनी शिवसेनेच्या तीन नेत्यांशी केलेल्या भेटीचा संबंध दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याशी होता. उद्योगमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांचे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर काही तासांतच फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, ज्यात त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नकळत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या