Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, मात्र उद्धव यांनी ठेवली ‘ही’ एक अट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, मात्र उद्धव यांनी ठेवली ‘ही’ एक अट

Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, मात्र उद्धव यांनी ठेवली ‘ही’ एक अट

HT Marathi Desk HT Marathi
Published Apr 19, 2025 05:27 PM IST

Raj Thackeray Uddhav Thackeray : मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाकरे कुटुंबात एकजूट होणार का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली ज्या प्रकारे संकेत दिले आहे, त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो, असं या दोघांनी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या पॉडकास्टचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. यामध्ये त्यांच्याशी मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी संवाद साधला . मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची माझी तयारी आहे.

राज ठाकरे म्हणाले की, कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत.

उद्धव यांनी ठेवली एक अट -

शिवसेनेची कामगार संघटना भारतीय कामगार सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मतभेद विसरून जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. पण महाराष्ट्रविरोधी किंवा अशा पक्षांसोबत काम करणार नाही, असे आश्वासन राज ठाकरे यांना द्यावे लागेल, अशी अटही उद्धव यांनी घातली. खरे तर महेश मांजरेकर यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न विचारला होता. 'माझ्यासाठी महाराष्ट्राचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे. दुसऱ्या सर्व गोष्टी त्यानंतर येतात. त्यासाठी कोणतेही मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्यास मी तयार आहे. तो मान्य करेल का, एवढाच प्रश्न आहे.

यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. मी एकत्र यायला तयार आहे, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही हे करू. पण राज ठाकरेंना महाराष्ट्रविरोधी लोकांसोबत जाणार नाही, असं सांगावं लागेल. या लोकांना पाठिंबा देणाऱ्यांसोबतही ते जाणार नाहीत, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घ्यावी लागेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अलीकडच्या काळात अनेक लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे आमनेसामने आले आहेत. या निमित्ताने दोघांमध्ये चर्चाही झाली आहे. तेव्हापासून हे दोघं एकत्र येऊ शकतील का, अशी चर्चा सुरू झाली होती.

संजय राऊतांची प्रतिक्रिया -

राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असेल तर मिटवायला वेळ लागत नाही. फक्त मुद्दा एवढाच आहे, महाराष्ट्राच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांच्याविरोधात आपण कोणताही संबंध ठेवता कामा नये. ठीक आहे २५ वर्षे आमची युती होती. त्यातला काही काळ राज ठाकरेही सहभागी होते. पण, शिवसेना तोडून महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांविरोधातील काळे कायदे, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असताना सुद्धा आपण या शक्तींबरोबर राहणे योग्य नाही, महाराष्ट्राला हे परवडणारे नाही ही भूमिका आमची आजही आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या