Shahajibapu Patil on ajit pawar : गेल्या वर्षी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करून थेट गुवाहाटी गाठलं होतं. त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी काय डोंगार ओक्के मदी हाय.. हा डॉयलॉग चांगलाच फेमस झाला होता. त्यावेळी शिंदे गटातील सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला, अशी तक्रार केली होती. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे पूर्ण करताना अडचणी येत असल्याचं म्हटलं होते. मात्र आता अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होताच शिवसेनेच्या आमदारांची भूमिका मवाळ झाली आहे.
सांगोल्याचे आमदारशहाजी बापू पाटील यांनी त्यावेळी अजित पवारांवर निधी वाटपात अन्याय केल्याची तक्रार केली होती. मात्र आता त्यांनीअजित पवारांचे तोंडभरून कौतुक करतआपल्या आधीच्या भूमिकेपासून यू-टर्न घेतला आहे.
गणपतराव देशमुख आमदार असताना सांगोला उपसा जलसिंचन योजनेसाठी दरवर्षी फक्त एक लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली जायची. मात्र ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री असताना माझ्या शब्दाखातर एका मिनिटात २० कोटी रूपयांची तरतूद केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
शहाजीबापू म्हणाले की, अजित पवार अर्थमंत्री झाल्याने तालुक्यातील रखडलेले सर्व प्रकल्प आता पूर्णपणे मार्गी लागतील. त्या दृष्टीने सरकार कार्यक्षम आहे. अजित पवार यांनी निधी वाटपात कधी अन्याय केला नाही. उलट माझ्या शब्दाखातर अजित पवारांनी ठाकरे सरकारच्या काळात उपसा जलसिंचन योजनेसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं आमदार पाटील म्हणाले.