Eknath Shinde on Sanjay Raut: दिल्लीत एका कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना' महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे व शरद पवार यांनी एकमेकांचे आपल्या भाषणात कौतुक केले. यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही, अशी जाहीर नाराजी राऊतांनी व्यक्त केली आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांना द्वेषाने पछाडलं आहे. आतापर्यंत त्यांना शरद पवार साहेब वंदनीय होते,पण पवार साहेबांनी माझा सत्कार केल्यानंतर त्यांनी पवारांचाही अपमान केला,असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, टीका करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली असून निवडणुकीत त्यांचा सुपडासाफ झाला आहे. त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं आहे. ज्या द्वेषाने ते पछाडले आहेत. त्यांना मोदी,शाह आणि एकनाथ शिंदेंचा द्वेष आहे. ते द्वेषाने इतके पछाडले आहे की, त्यांनी महापराक्रमी योद्धा महादजी शिंदे यांचाही अपमान केला. त्यांनी साहित्यिकांना दलाल म्हणत त्यांचाही अपमान केला. पवार साहेब त्यांना वंदनीय होते. मात्र माझा सत्कार केल्यावर त्यांचाही अपमान केला.
शिवसेनेत येण्यास जे जे इच्छुक आहेत, त्यांचं स्वागत करतो. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. जे येतात त्यांचं स्वागत करतो. ते का येत आहेत? त्याचं आत्मचिंतन समोरच्यांनी करावं” असं एकनाथ शिंद म्हणाले. उद्या राजापूरचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. साळवी यांनी आज ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं. त्यांनी बेईमानी केली म्हणून शिवसेनेत फुट पडली व महाविकास आघडीचं सरकार कोसळलं. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला नको पाहिजे होतं. ही आमची भावना असून यामुळे आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला होता.
संबंधित बातम्या