Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा
CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Delhi Tour: महाराष्ट्राचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
Maharashtra CM Shinde & Deputy CM Fadnavis Visit Delhi Today: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज (२४ जानेवारी २०२३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे. राज्यातील विविध विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तार आदी विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे.
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सातत्याने दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. शिंदे सरकारमधील २० मंत्र्यांनी जुलै महिन्यात मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे नवनवे मुहुर्त सातत्याने समोर आल्यानंतही ते हुकले आहेत. त्यामुळे आता मोदी मुंबई दौरा आणि आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (२३ जानेवारी २०२३) विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावरूनही राज्यात राजकीय नाट्य घडलं. आता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात नेमक कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यपाल पदापासून मुक्त करण्याची विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली असल्याची बातमी कालच समोर आली. "महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.