उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत ‘शिंदे गटाला’ जाऊन मिळाले!शिवसेनेला आणखी एक हादरा
शनिवारपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या बैठकीत उपस्थित राहणारे उदय सामंत आज सकाळपासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Political Crisis : गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत नॉट रिचेबल झाल्याचे समोर आले आहे. सामंत शनिवारपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या बैठकीत उपस्थित होते मात्र आज सकाळपासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळीच उदय सामंत सूरतला गेले असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे उदय सामंत हे शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत उपस्थित होते.
बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतून होणारी आमदारांची गळती थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास ५० आमदारांचा गट तयार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत. आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. कोकणातील दीपक केसरकर यांनी देखील पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्याशिवाय, रायगडमधीलही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.
उदय सामंत यांनी सुरतमार्गे गुवाहाटीला जाण्याआधी आमदार राजन साळवी यांना फोन केला होता. माझ्याबरोबर आपणही चला. पण राजन साळवी यांनी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.