मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘या’ कारणामुळे भाजपसोबत जाऊ या, असं मला एकनाथ शिंदे म्हणाले होते, पण.. - उद्धव

‘या’ कारणामुळे भाजपसोबत जाऊ या, असं मला एकनाथ शिंदे म्हणाले होते, पण.. - उद्धव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 24, 2022 11:43 PM IST

गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही. तुम्ही निवडून आणलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला दिलं.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेत बंड झाल्यानं राज्यातील राजकीय वातावरण खंगाळून निघाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाध्यक्ष व नगरसेवक महापौरांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही मर्दांची सेना आहे. ज्या-ज्या वेळी आपल्याला कोणी आव्हान दिलं त्यावेळी आपण त्यांना संपवून पुढं गेलोय. गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही. तुम्ही निवडून आणलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला दिलं. वर्षावर आता माझा शिवसैनिक जाईल असंही ते म्हणाले.  

उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला काहीजणांच्या वर्तणुकीविषयी शंका आल्यानंतर मी एकनाथ शिंदेनां बोलवलं आणि त्याबद्दल विचारलं. तेव्हा ते आधी म्हणाले की राष्ट्रवादीवाले आपल्याला त्रास देतात. त्यांना मी म्हटले की, आपण बोलू त्यांच्याशी नाहीतर एक घाव दोन तुकडे करू. नंतर म्हणाले की आपण भाजपसोबत जाऊया, असा आमदारांचा दबाव आहे. त्यावर मी त्यांना म्हटले की, भाजपकडून आपल्याला तसा प्रस्ताव येऊ दे. मात्र ज्यांनी आपली फसवणूक केली, मातोश्रीची बदनामी, कुटुंबियांची बदनामी केली, निवडणुकीत आपला विश्वासघात केला, त्यांच्यासोबत पुन्हा जायचे का. त्यावेळी मी त्यांना आमदारांना घेऊन यायला सांगितलं. आमदार माझ्यासमोर आले असते आणि हे सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नसती, असे उद्धव म्हणाले. 

जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिल त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शेराला सव्वाशेर मिळतोच. शिवसेना ही तळपणारी तलवार आहे, ती म्यानात घातली तर गंजते, आणि बाहेर काढली तर तळपते. तीच आता वेळ आली आहे. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. आपल्याच लोकांनी पाठित खंजीर खुपसलं आहे. जेव्हा शिवसेनेला डिवचंला आहे त्यावेळी शिवसैनिक चवताळून उठला आहे. काहीजण या बंडामागे मी असल्याचे सांगत आहेत. मात्र यात माझा काहीच संबंध नाही.

उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्या आमदारांना इशारा देताना सांगितलं की, या बंडाच्या मागे मी आहे असा संदेश पोहोचवला जातोय. मी शिवसेनेमध्ये गद्दारी करणार नाही. आज जर वेगळा तुम्ही गट स्थापन केला, आणि नंतर तो फुटला तर तुमची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे शिवसेनाही संपेल आणि तुम्हीही संपाल. आज जे निवडून आले आहेत त्यांना पुन्हा निवडून येणं शक्य नाही.

भाजप शिवसेना संपवायला निघालाय -

उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्ती निवडून येतील अशा ठिकाणी आताच्या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून दिलं. त्या ठिकाणी तुमचा हक्क असतानाही तुम्ही माझा आदेश पाळला आणि त्यांना निवडून दिलं. ज्यांना निवडून दिलं ते आपल्याला सोडून गेले. आजही तुम्हाला सांगतोय की पक्ष चालवायला मी जर योग्य नसेल तर मला तसं सांगा, मी हे पद सोडतो. शिवसेना हा विचार आहे, तो विचार भाजप आता संपवायला निघाला आहे. त्यांना हिंदुत्वाच्या विचारामध्ये भागिदार नको आहे. 

IPL_Entry_Point